ही कथा आहे एका अश्या सुकुमार गोड मुलाची ज्याला अक्षर ओळखी पासून ते लिहण्यावाचण्यापर्यंत अडचणी आहे. ज्याला आजच्या वैज्ञानिक भाषेत "डिसलेक्सिया" असं म्हणतात.

तर अश्या ह्या मुलाची मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. 

"एक मुलगा होता नका विचारू कुठं. तो लिहू वाचू शकत नव्हता. बऱ्याच प्रयत्नांती त्याला काहीच आठवत नसे. की वाय एक्स च्या नंतर येतो. अक्षरं जशी त्याची त्याला दुष्मन वाटावेत. ते त्याच्या समोर नाचत नाच करून त्याचा जीव नकोसा करून त्याला त्रास देत.
लिहणं वाचणं थकवत असे त्याला. दुःख आपलं तो सांगेल कुणाला. मेंदू त्याचा फुल्ल होता. स्टार्टर त्याचा गुल होता. वरून ऐ बी सी डिस्को. नापास झाला एक दिवशी बिचारा. 
लिहावाचण्याच्या वजनाने मेलेला. लोकांनी त्याला ठार वेडा ठरवलं. पण मुलाने सारा अपमान मोठ्या शौर्याने सहन केला. मग एके दिवशी त्याने एक चमत्कार केला की, जी गोष्ट प्रत्येकाने ऐकली ती कानोकान पसरत गेली. सांगा सांगा सांगा कोण"

माझ्या प्रमाणे तुम्हा साऱ्यांना आतापर्यंत कळलेच असेल की मी सण २००७ ला प्रदर्शित झालेल्या "तारे जमीन पर" च्या चित्रपटातील "ईशान नंदकिशोर अवस्थी" बद्दल बोलतोय पण तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून ते होते महान भौतिकशास्त्रज्ञ व सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक "श्री.अल्बर्ट आइन्स्टाइन" ज्यांनी जगाला आपल्या थेअरी ऑफ रेलटीव्हीटी ने हलवून टाकलं.त्यांच्या "सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी" इ.स १९२१ साली त्यांना नोबेल पुस्कार देऊन "सन्मानित" केले गेले.
ह्या महाशयांप्रमाणेच "लिओनार्दो दा विंची" ज्यांनी एका उडत्या विमानाचे चित्र खरेखुरे विमान उड्डाण घेण्याच्या ४०० वर्षापूर्वीच चित्रित केलं होतं. त्यांचे लिखाण एखादे सामान्य लिखाण आपण आरश्यात पहावे असे होते. जसं आताच्या रुग्णवाहिकेवर AMBULANCE जश्या आरश्यात उलट्या दिसणाऱ्या प्रतिमेप्रमाणे. अजून ह्यांसारखे ज्यांनी जगात इलेक्ट्रीसिटीने जगमागाट प्रसरवला अश्या थॉमस अल्वा एडिसन ह्यांनाही अश्या प्रकारे अडचण येई. सर्वात महत्वाचा आपल्या साऱ्यांचा ओळखीचा शहेशना चा पुत्र अभिषेक बच्चन ह्यालाही डिसलेक्सीया ने त्रस्त करून सोडलं होतं पण ही लोकं ह्याच अडचणीचा उदोउदो करत राहिले नाहीत तर त्यांनी जगाला आपली नवी ओळख दिली आणि जगाला त्यांची ओळख करून घेण्यास भाग पाडले.

हे सारं मी का लिहतोय किंवा सांगतोय तर हेच सांगायला की दुनियेत असे असे हिरे पैदा झाले ज्यांनी साऱ्या जगाचा नकाशा बदलून टाकला कारण की ते दुनियेला एका वैगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकले. 
मेंदू जरा ह्या लोकांचा वेगळा होता आणि हेच लोकांना सहन झाले नाही त्यांनी ह्यांच्या पुढ्यात अनेकानेक अडचणी त्यांच्या समोर उभ्या केल्या तरी ते जगले आणि असे जगले की लोकांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली.

काल परवा दूरदर्शन वर सुरू असलेल्या पण व्यापारी भेजा असलेल्या चॅनेल च्या मालकांनी मध्येच व्यत्यय आणणाऱ्या जाहिराती टाकून मला तो पूर्णतः पाहू दिला नाही किंबहुना मी तो टेलीविजनवर पाहु शकलो नाही. म्हणून मग काय झाले. मोबाईल कंपनीच्या मालकाच्या खिश्यात मी दोन महिन्यात करिता तब्बल चारशे रुपये मात्र खर्च केले आहे ह्याची आठवण माझे काटकसरी मन कसे विसरेल तेव्हाच मी ह्या चित्रपटाच्या शोधार्थ गूगल बाबाचे पाय धरले आणि बाबानी तो माझ्या मोबाईलवर डोउनलोड करून दिला.

ह्यातही माझ्यासारख्या सांसारिक पुरुष्यास व्यत्यय हा येतच गेला आणि आता आताशी मी तो पूर्ण पाहून संपवला.

चित्रपट "ईशान नंदकिशोर अवस्थी" ह्या सुकुमार गोजऱ्या बालकांवर चित्रित झाला असून. त्याच्या घरात त्याचा दादा, आई आणि बाबा असे चौकणी कुटुंब राहतं. जे सतत कुटल्या ना कुठल्या घाई गडबडीत वावरत राहत पण हा बालक मात्र त्याच्याच जगतात असतो. त्यावर लिहलेलं एक सुंदर गाणं पार मनाच्या चारही कोपऱ्यांचे ठाव घेतं.
ते असं " दुनिया का नारा जमे रहो" आणि त्या गाण्यातील सूर्यनारायण डोक्यावर येईस्तोवर लोळत राहिलेल्या ईशान वर चित्रित झालेल्या ओळी आहे. " यहा अलग अंदाज है जैसे झिडका कोई साज है हर काम को टाला करते है यह सपने पाला करते है" पण नियती नावाच्या विद्रुप वाघिणीला काही औरच मंजूर असते.
 इशांतने बंक केलेली शाळा आणि त्यांनंतर दादा योहन कडून लिहून घेतलेली अबसेन्ट नोट श्रीयुत अवस्थी ह्याच्या हाती लागते हे एक आणि त्याचा लोळत पडण्याचा आपल्याच मस्तीत जगण्याचा अंदाज त्याच्याच अंगलट येतो आणि त्याची रवानगी त्याचे पप्पा श्री. नंदकिशोर अवस्थी त्याची रवानगी बाहेरगावी एका बोर्डिंग स्कूलमध्ये करायचे ठरवतात.

कालांतराने कितीही वरच्या पट्टीत पोहणारा कुख्यात गुन्हेगार कारागृहाच्या चार बंद भीतीत स्वतःस गाडून घेतो त्यानुसार बिचारा इशांतही स्वतःस त्या बोर्डिंग स्कूल च्या आवारात स्वतःस बंदिस्त करून घेतो. असेच एक दिवशी त्याच्या वर्गात चित्रकलेचा तास सुरू असतो. आणि हा आहे की वर्गाच्या खिडकीतून चिऊताईच्या खोप्याकडे पाहण्याच्या नादात गुरफटून जातो त्याचे चित्रकलेच्या शिक्षकांकडे बिलकुल लक्ष नसतं. पण त्याच्या त्या चित्रकलेच्या विनाफुट पट्टी वापरून सरळ रेषा काढणाऱ्या शिक्षकांच्या लक्षात ही बाब येते. त्यांचा राग अनावर होतो. खडूने एक टिंब फळ्यावर काढून तोच खडू ते इशांन च्या दिशेने भिरकवतात आणि तो बरोबर ईशांनच्या कपाळावर जाऊन आदळतो. ज्याच्यावर त्याच्या जन्मानंतर पाच दिवसांनंतर आलेल्या साटवाईने त्याचे पुढील भविष्य चित्रित केलेलं असते. तेवढ्यावरच शिक्षक महाशय थांबत नाहीत. त्याला ते त्यांच्या समीप बोलवतात व त्याच्या इवलुश्या हाताच्या बालमुठीवर पाच छड्यांचा प्रसाद त्याला देतात. त्या छडयांच्या वेदनेची सनक पार माझ्याही अंतर्गला छेदून डोळ्यातुन गंगा यमुनेच्या पुराला घेऊन येते.

थोड्या दिवसांनी त्या चित्रकलेच्या शिक्षकांची बदली न्यूझीलंड येथे होते व त्यांच्या जागेवर एक बदली शिक्षक म्हणून श्री.राम निकुंभ ह्यांचा प्रवेश होतो. आता सुर्यनारायनाच्या प्रस्तानानंतर कोमजलेल्या सुर्यफुलाच्या फुलाप्रमाणे कोमजलेल्या ईशांनच्या जीवनांत इंद्रधनुषी रंग फाकण्यास चित्रकलेचा शिक्षक म्हणून आलेले श्री. राम निकुंभ विविधांगांणी रंग भरण्यास सुरुवात करतात. प्रभेच्या कोमल सूर्यकिरणांनी परत एकदा ईशानरुपी सूर्यफूल त्याच टवटवीतपणाने उमलून येते. इशांनला श्री.राम निकुंभ ह्यांच्यात जीवभरासाठी एक समदुखी जोडीदार गवसतो त्यांच्यात त्याला त्याची आई सुद्धा सापडत असावी.

एकूण वरील चित्रपट आपल्या अंतरंगात डोकावण्यास भाग पाडतो. जगतातील कितीतरी थोर थोर व्यक्ती त्यांच्या शालेयजीवनात किती पिछाडीवर होती आणि आज सारं जग कसं त्यांना डोक्यावर घेऊन नाचतंय ह्याचा प्रत्यय प्रत्येक छोट्या छोट्या सदोहरणांनी श्री. निकुंभ सर पटवून देतात.

आज सारेच शिक्षक जर का श्री. राम निकुंभ ह्यांच्या सारखे झाले तर शालेय आवारात नंदनवन अवतरेल आणि आकाशात असलेले खरे खुरे तारे जमिनीवर येतील ह्यात शंका नाही.

दि. १३.०१.२०२०
धुळे, महाराष्ट्र
श्रीकांत सुनंदा घरटे पाटील

Comments

Popular posts from this blog

पुस्तक